काळीज जळले
असहाय्य माता
विश्वासाने दूर केले
काळजाच्या तुकड्याला
जगविण्या तुला बाळा
देवदूताहाती दिला
हलगर्जी कारभार ,
साथ दैवाने सोडली
सारे धुळीस मिळाले
स्वप्ने आगीत जळाली
फुटण्याच्या आधी आटे
पान्हा पदरी आतला
क्रूर निर्दयी काळच
कसा विश्वास ठेवला
असे स्मशानरूदन
माझे रडणे जगात
चाले तांडव मृत्यूचे
संजीवन महालात
आज फाटले आभाळ
कुठे टेकू द्यावा त्यात
वाटे धरित्री फाटावी
व्हावे गुडूप भुईत
भावनेची झाली राख
मागे मोबदला आज
बने आभाळ भिकारी
गरिबीने उन्हाळ्यात.
...अर्चना मुरूगकर.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा