प्रदूषण

 *प्रदूषण टाळा अन्यथा विनाश अटळ*


नमस्कार.. 

पर्यावरण म्हणजे जिवाच्या आजूबाजूचा परिसर! याचा जिवावर परिणाम होतो तसाच जिवाचाही पर्यावरणावर परिणाम होतो. अरण्यात राहणारा माणूस ते आजचा माणूस यात खूप फरक झाला आहे. तसाच पर्यावरणातही फरक झाला. 

निसर्गाशी संलग्न असे जीवन जगणारा माणूस ते निसर्गाचा फक्त उपभोग घेणारा माणूस असा बदल प्रकर्षाने जाणवत आहे. 

तापमान बदल, मातीची झीज, ग्रीन हाऊस इफेक्ट, हवा प्रदूषण, पिण्याच्या पाण्याचे प्रदूषण, रासायनिक खतांचा वापर, हायब्रीड बियाणे, बायोटेक्नॉलॉजीचा फायद्यासाठी वापर ही सगळी पर्यावरण -हासाची उदाहरणे. 

याचे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. निसर्गातील संपूर्ण सजीव, निर्जीव घटकांवर याचा परिणाम होत आहे.आपली निसर्गपुजकाची संस्कृती! निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कितीतरी सण आपण साजरे करतो. नदीला आई म्हणतो. देवी म्हणून पूजा करतो. पण हळूहळू ही प्रथा शिल्लक राहिली आणि त्यामागची पर्यावरण रक्षणाची भावना कमी झाली. 

आजच्या आपल्या राष्ट्रपती मा. द्रौपदी मूर्मू यांनी आदिवासी समाजाची ओळख करून देताना 'आम्ही निसर्गात राहणारे आणि निसर्गाचे रक्षण ही करणारे आहोत' हे अभिमानाने सांगितले. 

 आज प्रकर्षाने जाणवते की शहरी माणसांना याची जाणीव कमी प्रमाणात आहे. 

लोकसंख्यावाढ, काॅंक्रीटची जंगले, कारख्यान्यांची पर्यावरणाबद्दलची अनास्था, अन्नधान्याची कमतरता, साथीचे आजार हे सगळे भयावह आहे. पुढील पिढ्यांसाठी जगण्यासाठी हक्काची शुद्ध हवा, पाणी, भेसळरहित अन्न हे तरी आपण शिल्लक ठेवणार आहोत का? 

मुख्य म्हणजे आपला शेतीप्रधान देश,प्रदूषणाचा त्याअंती हवामानबदलाचा शेतीवर होणारा परिणाम याचा कोण विचार करणार? 

व्यक्तीगत पातळीवर आणि व्यवस्थेच्या पातळीवर याचा विचार होणे आवश्यक आहे. 

म्हणूनच अत्यंत कळकळीने हे सांगावेसे वाटते की प्रदूषण टाळा अन्यथा विनाश अटळ आहे. 


सौ. अर्चना मुरूगकर

तळेगाव दाभाडे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा