पर्यटन

 



पर्यटन- भ्रमंतीचे  महत्व


पर्यटन ही एक अनुभूती आहे. नेहमीच्या त्याच त्या कामातून माणूस बाहेर पडतो. त्याला हा बदल सुखावणाराच असतो.थंडगार मोकळी हवा, निसर्गाचे सन्निध्य आणि कुठलेच वेळेचे बंधन नसणे यासारखे सुख नाही. रोम रोम आनंदाने पुलकित होतो. यातून भिन्न संस्कृती समजते. वेगवेगळ्या ठिकाणचे आहार विहार, आचार, पोषाख यांची माहिती मिळते. खाद्यपदार्थांवरही ताव मारता येतो. बरं आजच्या काळात सारे कुटुंब एकमेकांना पूर्ण वेळ देऊ शकते. अनेक सफरी संस्मरणीयही ठरतात.

  पर्यटनामुळे अनेक ऐतिहासिक ठिकाणे प्रत्यक्ष पहाता येतात, भौगोलिक वैविध्य समजते, जैविक वैविध्य, वेगळी झाडे, माती, डोंगर, कधी बर्फ तर कधी समुद्र अनुभवता येतो. अनुभवणे हे व्ययक्तिक पातळीवरचे असते.माणसाला ताणतणावांचा विसर पडतो. पुन्हा कार्य करण्याची उर्मी मिळते. संघामुळे  आनंद वाढतो. 

 माणसाचे आपल्या घरावर प्रेम असते. घर सुटतच नाही. या प्रवासाच्या धामधुमीत सर्व कष्टदायक जबाबदाऱ्यांतुनही आपसूकच मुक्तता होते. आपल्यामुळे जगात काही फरक पडत नाही, हे तरी कळतेच.

उत्साहाने जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती वाढते. तीच ती रूढी बंधने मागे सुटतात.  जागोजागी सेल्फी घेणारे, फोटो काढणारे उत्साही लोक पाहून संकोच गळून पडतो आणि जो तो मुक्ततेचा अनुभव घेतो. शहरी लोकांना ग्रामीण भाग, तिथली शांतता, जीवनशैली अनुभवायला मिळते. तर ग्रामीण मंडळींना शहरातला झगमगाटही पर्यटनामुळे अनुभवता येतो. 

या सगळ्यांनाच उदात्त, विशाल निसर्गाचा अनुभव घेता येतो. माणूस निसर्गाचा भाग असल्याने हे निसर्ग सहचर्य त्याला मनापासून भावते. 

मानशास्त्रियदृष्ट्या मानसिक शांतीसाठी हे फार आवश्यक आहे. 

शिवाय पर्यटनामुळेव्यवहार चातुर्य वाढते.संवादकौशल्य,समायोजन हे गुणही वाढतात. स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींच्या खरेदीचा आनंद घेता येतो.या बाबी सुद्धा पुन्हा आठवणीतून सुखद अनुभव देतात. विविध प्रकारचे लोक नुसत्या निरीक्षणातून समजू लागतात. 

अशा रितीने मजा घ्यायला लावणारे एक पर्यटन संपले की मन दुसऱ्या सफरीची वाट पाहू लागते. 


अर्चना मुरुगकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धबधब्यावरील अपघाताची कारणे व उपाय*

हायकू

जाणता राजा